पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या 184 रेल्वेगाड्यांपैकी वास्को द गामा (गोवा) ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) ते सिद्धेश्वर (सोलापूर) या दोन गाड्यांसाठी प्रवाशांना सर्वाधिक वाट पाहावी लागत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वेगाड्यांना होणारा विलंब ही नित्याची बाब ठरली असून, गेल्या सहा महिन्यांत याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. सर्वांत कमी विलंब गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकामध्ये होत असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले आहे.
"रेलयात्री‘तर्फे जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत देशातील 2500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वेळांचे आणि विलंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. एखाद्या गाडीला एखाद्या स्थानकावर येण्यासाठी त्याच्या पूर्वनियोजित वेळेपेक्षा किती जास्त वेळ लागला, हे "विलंबा‘मागचे गणित लक्षात घेऊन हे सर्वेक्षण केले आहे. रेल्वेगाड्यांच्या थांबण्याची ठिकाणे लक्षात घेऊन...
more... दर महिन्यात 10 लाख ठिकाणांच्या नोंदी करण्यात आल्या. देशातील रेल्वे प्रवाशांनी विविध स्थानकांवरून पाठवलेल्या माहितीच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की राष्ट्रीय पातळीवरील गाड्यांचा सरासरी विलंब हा 30 टक्क्यांनी घटला आहे.
"रेलयात्री‘चे सहसंस्थापक कपिल रायझादा म्हणाले, ""जगात रेल्वेगाड्यांना त्यांच्या शेवटच्या स्थानकावर पोचण्यासाठी लागलेला वेळ ग्राह्य धरला जातो. त्यामुळे एकूण प्रवासामध्ये काही स्थानकांवर उशीर झाला तरी शेवटच्या स्थानकावर गाडी निर्धारित वेळेवर पोचण्यासाठी वेळ आणि वेग वाढवून दिला जातो. त्यामुळे स्थानिक पातळ्यांवर प्रवाशांना होणारा विलंब व त्रासाची माहिती योग्य पद्धतीने समोर येत नाही. सर्व स्थानकांवर होणाऱ्या विलंबाचा विचार करणे हीच पद्धत अधिक सयुक्तिक ठरते.‘‘
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष राठी म्हणाले, ""रेल्वे गाड्यांना होणारा विलंब कमी करण्याबाबत रेल्वे मंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पावले उचलली आहेत. ही मोठी सुधारणा असून, त्याचे परिणामही दिसून येत आहेत. विलंबामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कोणत्या स्थानकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल याचा अंदाज सर्वेक्षणातून येऊ शकतो. त्यामुळे रेल्वेच्या विलंबाचा कालावधी आणखी नियंत्रित करता येईल आणि संपूर्ण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवता येईल.‘‘
खासगी संस्थेच्या माहितीच्या आधारे आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, आमच्या अंतर्गत माहिती व वेळांच्या नोंदींनुसार पुणे स्थानकावर सर्व गाड्या वेळेवर येतात व जातात. त्यामुळे रेल्वे बोर्ड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानही केला आहे.‘‘
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग